काही माणसं अधूनमधून अकारण आठवतात; म्हणजे जिवंतच असतात ती आपल्यासाठी. ( आणि काही लोकांविषयी कुणी अवचित काही विचारलं तर ते जिवंत आहेत की नाहीत हेच आठवत नाही.) आजकाल मला ‘चांगलं वागणारी’ माणसं जास्त आठवताहेत. चांगुलपणाची डेफिशिअन्सी तयार झाली असावी आयुष्यात बहुतेक.
सकाळीच आठवण आली ती प्र. ई. सोनकांबळे सरांची. अत्यंत प्रेमळ माणूस, असं त्यांचं तीन शब्दांत वर्णन करता येईल. प्रेमळपेक्षाही ‘मायाळू’ हा शब्द अधिक अचूक! मी औरंगाबादला आर्ट स्कूलमध्ये शिकत होते, तेव्हा कधीमधी सरांची भेट होई. कधी ते आर्टस्कूलमध्ये येत, कधी एखाद्या कार्यक्रमात दिसत. त्यांचं भाषणही सहज संवादासारखं अगदी साधेपणाचं असे.
दरवर्षी एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी ते आपल्या आईच्या ‘गुणाबाई’च्या नावानं बक्षीस देत. ते एकदा मला मिळालं होतं. त्यांची ती मी न पाहिलेली आईही मला त्यांच्यासोबत आठवते.
मी बी.एफ.ए. करताना ऑक्टोबरच्या टर्ममध्ये एम.ए.ची परीक्षा देऊन समांतररीत्या एम.ए. देखील पूर्ण करायचं ठरवलं. पहिल्याच वर्षाच्या पेपरच्या आदले दिवशी माझ्या मामी हार्टच्या ऑपरेशनच्यावेळी वारल्या. परीक्षा न देता मी नांदेडला गेले. मग एप्रिलमध्ये दोन्ही परीक्षा सोबत आल्या. पहिलाच पेपर क्रॉस होत होता. पण आर्टस्कूलचे काही ‘पेपर’ तीनतीन दिवस चालतात; त्याचा फायदा घेतला. सेंटर नेमकं सोनकांबळे सरांचं कॉलेज. एका परीक्षेतून उठून घाईत गेले आणि परीक्षेच्या काळात सरांना भेटू नये, संपल्यावरच भेटावं असंही वाटत होतं. पेपर सुरू होऊन जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील, सर राउंड घ्यायला आले. आल्यावर आधी विद्यार्थ्यांना अनौपचारिक शुभेच्छा, मग प्राध्यापकांशी आपुलकीनं बोलणं… मग रांगेतून फिरताना त्यांना मध्येच मी दिसले.
“अगं, तू इथं कशी? तू तर चित्रकला शिकतेस ना?” म्हणत त्यांनी चौकशी सुरू केली.
सगळा वर्ग पाहतोय म्हटल्यावर मी ओशाळी झाले, पण त्यांच्या मोठ्या आवाजात गप्पा सुरूच. मग एकदाचं हुशार मुलीचं सर्टिफिकेट त्यांनी मला खणखणीतपणे देऊन टाकल्यावर मी उभी राहिलेली बसून पेपर लिहायला सुरुवात केली. राउंड झाल्यावर पुन्हा जवळ येऊन त्यांनी विचारलं,”चहा पाठवू का तुला? तिकडे परीक्षा देताना जेवलीस तरी की नाही? मेसमध्ये जेवण बरं असतं का?”
माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. म्हटलं,”सर. चारी पेपर संपले की तुमच्या केबिनमध्ये येऊन चहा पिऊन जाईन.”
‘आठवणींचे पक्षी’ हे सरांचं आत्मचरित्र. या पुस्तकानं शाळकरी वयात माझ्यावर मोठे संस्कार केले. त्यातला एक धडा आम्हांला सातवी का आठवीत अभ्यासात होता. त्या अनुभवाविषयी मी माझ्या ‘ग्राफिटीवॉल’ या पुस्तकात लिहिलंय. अन्न, कपडे काहीही अनावश्यक संचय करून ठेवणं किंवा माज करून एवढ्यातेवढ्या कारणानं फेकून देणं मला आजही जमत नाही. चांगली पुस्तकं कोवळ्या वयात हाती पडली की संवेदनशील मनं विचारीही बनतात. योग्य विचारांचं वळण ज्या पुस्तकांनी मला लावलं त्यातलं हे एक पुस्तक. खरंतर विद्रोहाचं वय, चळवळींमधून येणारा आक्रस्ताळेपणा योग्यच वाटायचा तेव्हा… त्याचवेळी एक माणूस प्रेमळ वागून, समजून घेत किती मनं बदलू शकतो, किती विद्यार्थी घडवू शकतो, हे मला त्यांच्यामुळे समजलं.
पुढे संपर्क तुटला. एकदा औरंगाबादला गेले असताना त्यांना भेटावं म्हटलं, तर श्याम देशपांडेनी सांगितलं की,”सरांना स्मृतिभ्रंश झालाय. कुणालाच ओळखत नाहीत.”
तरीही जावं की नाही अशी चलबिचल होत राहिली. पण हिंमत झालीच नाही अखेर. आपल्या माणसांचे कोरे डोळे पाहणं फार अवघड असतं.
मग केव्हातरी सर गेल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली. मनात आलं, आपला स्मृतिभ्रंश होत नाही तोवर सर जिवंतच असणार आपल्यासाठी!
दरवर्षी एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी ते आपल्या आईच्या ‘गुणाबाई’च्या नावानं बक्षीस देत. ते एकदा मला मिळालं होतं. त्यांची ती मी न पाहिलेली आईही मला त्यांच्यासोबत आठवते.
मी बी.एफ.ए. करताना ऑक्टोबरच्या टर्ममध्ये एम.ए.ची परीक्षा देऊन समांतररीत्या एम.ए. देखील पूर्ण करायचं ठरवलं. पहिल्याच वर्षाच्या पेपरच्या आदले दिवशी माझ्या मामी हार्टच्या ऑपरेशनच्यावेळी वारल्या. परीक्षा न देता मी नांदेडला गेले. मग एप्रिलमध्ये दोन्ही परीक्षा सोबत आल्या. पहिलाच पेपर क्रॉस होत होता. पण आर्टस्कूलचे काही ‘पेपर’ तीनतीन दिवस चालतात; त्याचा फायदा घेतला. सेंटर नेमकं सोनकांबळे सरांचं कॉलेज. एका परीक्षेतून उठून घाईत गेले आणि परीक्षेच्या काळात सरांना भेटू नये, संपल्यावरच भेटावं असंही वाटत होतं. पेपर सुरू होऊन जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील, सर राउंड घ्यायला आले. आल्यावर आधी विद्यार्थ्यांना अनौपचारिक शुभेच्छा, मग प्राध्यापकांशी आपुलकीनं बोलणं… मग रांगेतून फिरताना त्यांना मध्येच मी दिसले.
“अगं, तू इथं कशी? तू तर चित्रकला शिकतेस ना?” म्हणत त्यांनी चौकशी सुरू केली.
सगळा वर्ग पाहतोय म्हटल्यावर मी ओशाळी झाले, पण त्यांच्या मोठ्या आवाजात गप्पा सुरूच. मग एकदाचं हुशार मुलीचं सर्टिफिकेट त्यांनी मला खणखणीतपणे देऊन टाकल्यावर मी उभी राहिलेली बसून पेपर लिहायला सुरुवात केली. राउंड झाल्यावर पुन्हा जवळ येऊन त्यांनी विचारलं,”चहा पाठवू का तुला? तिकडे परीक्षा देताना जेवलीस तरी की नाही? मेसमध्ये जेवण बरं असतं का?”
माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. म्हटलं,”सर. चारी पेपर संपले की तुमच्या केबिनमध्ये येऊन चहा पिऊन जाईन.”
पुढे संपर्क तुटला. एकदा औरंगाबादला गेले असताना त्यांना भेटावं म्हटलं, तर श्याम देशपांडेनी सांगितलं की,”सरांना स्मृतिभ्रंश झालाय. कुणालाच ओळखत नाहीत.”
तरीही जावं की नाही अशी चलबिचल होत राहिली. पण हिंमत झालीच नाही अखेर. आपल्या माणसांचे कोरे डोळे पाहणं फार अवघड असतं.
मग केव्हातरी सर गेल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली. मनात आलं, आपला स्मृतिभ्रंश होत नाही तोवर सर जिवंतच असणार आपल्यासाठी!