प्रभ्याला इचारावं लागंल.
पण प्रभ्यानं च्यानलला चिकटल्यापास्नं आभ्यास करणंच सोडून दिलंया. नव्या जमान्यात नव्या पत्रकारांनी आभ्यास आसल्यासारखं दाखवलं तरी चाल्तंय म्हण्तो त्यो. नाईतरी कोण्च्याय चर्चा पाह्यल्या तरी आउटसोर्सिंगच जास्ती क्येल्येलं आस्तंय. चार-पाच लोकं बोलवायचे, त्यांना अधूनमधून चाबी द्यायची, कधी आपण अँकर हाओत ह्ये दाखवावं वाटलं तर मध्येच येखांदी काडी करायची, बाकी त्ये या बाजूनं त्या बाजूनं आपसात वाद करीत र्हात्येत. समारोपाला आपण तिसरंच काईतरी सांगून मोकळं व्हयाचं. प्रभ्याचा बाप म्हणायचा का, “प्रभ्या, माणसानं खोटं बोलावं पण रेटून बोलावं.”
प्रभ्या येरवी काई बापाचं आयकणार्यातला नाई, पण आसल्या गोष्टी मात्र हमखास आईकतो. फुल्ल आत्मविश्वासानं खोटं बोलताना बैल गाभण आशीपण ब्रेकिंग न्यूज द्येता येती ह्ये त्याले ठाऊक झालं आणि त्याची दुनियाच बदलून ग्येली.
प्रभ्याची दुनिया आजूक येका गोष्टीनं पार बदलली हुती. जमिनीचं आस्मान झालं आणिक आस्मानाची जमीन झाली इत्की बदलली. आता आशे बदल कामुन हुत्येत ह्ये तुमाले म्हाईती आसंलच. प्रेमात पडलं माणूस की त्याले विहीरबी खड्डा वाटते आणि समुद्र तर काय येक टांग टाकून डबरा वलांडावा तसा वलांडता येईल आसं वाटते, तसंच प्रभ्याचं झालं. जमाना नवा हये. आता काई जुन्या काळच्या वानी आभाळाचा कागुद, समुद्राची शाई आणि झाडाची लेखणी करून प्रेमपत्रं लिव्हण्याची जरूरत र्हाईली नाई. येक एसएमएस टाकला ‘आय लौ यू’ म्हणून का व्हऊन जातंय काम. ‘आय लव्ह यू टू’ म्हणून रिप्लाय आला तर दुधात साखर. नाहीतर आजून थोडी कोशीस करावी लाग्ते.
गावातल्या गावात आसंल तर लैच सोप्पंबी र्हातंय आणि आवघडबी. सोप्पं अशाले का वळख र्हातीच, शाळंपास्नं पोरंपोरी येकमेकांना वळखत आसत्येत. आवघड अशाले का येकमेकांचे मायबाप आणि आख्खं गणगोतबी येकमेकांना वळखत आस्तंय. त्यात प्रभ्याचा दणका आजून न्यारा होता. त्याला आवडलेली सीताबाईची सायली वायल्या जातीची हुती आणि प्रभ्या वायल्या जातीचा. बदलापुरात कधीतरी भांडं फुटणार हितं त्ये फुटलंच आणि वावटळीचं वादळ हुणार आसं दिसू लाग्लं. गावातले गडी जमवाजमव करू लाग्ले का आपण बदलापुरात खाप पंचायतीची स्थापना करायची. त्याच्याशिवाय ह्ये तरणे सांड ठिकाण्यावर येणार न्हाईत. यांना येसण घातलीच पायजे.
ह्ये बायायच्याबी कानी ग्येलंच. गावात काय, घरात काय बायकांपास्नं कोण्ती गोष्ट लपून र्हाते का कधी?
“सखुबाई, आमी हे काय आयकून र्हईलो?” आस्मिता सखुबाईकडच्या नव्या सोफ्यावर ट्येकता ट्येकता तावातावानं म्हनली.
“हां… तुमच्या घर्चे आमच्या घर्चे समदे गडी पंचायतीच्या आफिसात जमल्येत. समद्या पक्षायचे. मोज्जून येकन येक गडी घराबाहीर पल्डाय.”सुरेखानं दुजोरा दिला.
“तुमचा नंदोई पुढाकार घियालाय म्हनं. सीताबायची सायली लवम्यारेज करायचं म्हणायली तर आसं बदलापुरात चाल्णार नाई म्हणायलेत. यायला मेल्याला म्यारेजनंतरबी लव कर्ता येत नाई आणि दुसरे आदीपासून करायलेत तर बगवना…” कुसुमनं बोटं मोडली.
“काय्ये… मी दोनचार दिवस तापानं आंग कणकणलं तर झोपूनच हये… गावात, घरात काय घडलं काई पत्ताच नाई… नीट सांग काय झालं त्ये…” सखुबाई म्हण्ली.
“सखुबाई… कशी काय झोप लागू शकते तुला?”
“आगं… ह्ये पुरुषलोक म्हणायलेत का गावात ‘खाप पंचायत’ स्थापन क्येली पाईजे. निस्ते आदेश नाई फतवेबी काडले पाईजेत. या बाया लई झपाट्यानं बदलायल्यात, त्यांना येसण घातली पाईजे.” आस्मितानं सांगलं.
सखुबाई पुन्ना इचारात पडली.
आता आसं काई करू नका म्हणलं की या बाप्यांना लग्गेच च्येव चडणार आणि हट्टाले पेटून त्ये नको म्हणलेलं आचूक करणार. यांना आडवावं कसं? तिनं आपल्या आज्जीचा चेहरा डोळ्यांपुढं आणला. टिकलीसंगट कपाळ चिमटीत पकडलं.
सगळ्या बाया श्वास रोखून गपगार हुत्या.
मग येकदम तिले हासायलेच आलं. म्हणली, “काळजी नुका करू. करूंदेत त्येंना ‘खाप पंचायत’ स्थापन. उद्याच्याले आपण समद्या बाया पंचायतीत जमू आणि ‘काप पंचायत’ स्थापन करू. आपणबी आदेश आणि फतवे काडू. हाय काय आन नाय काय? आपल्याले कोण रोखणार? त्ये धमकी द्येत्यात तर आपणबी धमकी द्येऊ का कापून काढू येकेकाचं… हाय काय आन नाय काय! लोकशाही हये…”
बायायचे चेहरे येकदम उजळले.